पनवेलमध्ये वारकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

0
210

निर्बंध चालतील पण बंदी नको; वारकऱ्यांनी व्यक्त केली भावना

पनवेल : विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय पनवेल प्रखंड यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना आज (शनिवार दि.१७ जुलै) एक निवेदन देण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी पंढरपुराला जात असतात. मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळे सर्वांनीच समजुतदारपणे पायी वारीचे आयोजन केले नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवत असल्याने सर्व नियम पाळून वारकऱ्यांनी पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील हिंदुधर्म विरोधक सरकारने यावर्षी पायीवारीवर पुन्हा बंदी घातली. आणि एवढेच नव्हे तर जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनाही अटक केली. अशा प्रकारे वारकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जात आहे. असे वारकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

           संविधानाने नागरिकांना दिलेला उपासना करण्याचा अधिकार आणि मुलभूत स्वातंत्र यांना कोणी अडवू शकत नाही असे म्हणत अनेक वारकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. या धोरणांविरुद्ध विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने पनवेल तहसीलदार कार्यालयाबाहेर सरकारचा निषेध करण्यात आला. तहसीलदार कार्यालय पनवेल येथे नायब तहसीलदार संजीव मांडे यांच्याकडे निवेदन देताना अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनाजी महाराज पाटील, पुंडलिक महाराज फडके, विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड संयोजक सुभाष कडव, विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी चालक सुरेश महाराज पाटील, श्री.संत चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचे संचालक वसंत महाराज दुर्गे, विश्व हिंदू परिषद बजरंग दल पनवेलचे संजय उलवेकर, गुरुनाथ मुंबईकर यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

          मागच्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वारीसंदर्भात कोणीही वारकऱ्यांनी उठाव केला नाही. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार व विविध निर्बंधांनुसार पालन करण्यात आले होते. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून एका दिंडी मागे किमान दहा वारकऱ्यांना चालण्याची सरकारने परवानगी दिल्यास वारकऱ्यांना आनंद झाला असता. परंतु वारीला परवानगी न देता सरकार राबवित असलेल्या धोरणांमुळे अतिव दुःख होत आहे. त्यामुळे यापुढे कार्यक्रमांचे आयोजन करताना बंधने चालतील परंतु बंद नको; असे यावेळी वारकऱ्यांनी बोलताना सांगितले.

वारीदरम्यान कमी लोकांमध्ये कीर्तन, भजन करू, सोशल डिस्टनसिंग पाळू, मास्क लावू अशाप्रकारे सर्व निर्बंधांचे पालन करू परंतु सरकारने वारी करण्यावर बंदी घालू नये अशी मागणी समस्त वारकरी आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आली.

              गेली साडे सातशे वर्षे संत महात्म्यांपासून सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीला खंडित करण्याचा सरकारने प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर आमच्या संप्रदायाची वेशभूषाही उतरवली. ब्रिटिश आणि मुघल शासनाने जे कृत्य केले नाही ते महाराष्ट्र सरकारच्या काळात झाल्याने दिंडी स्वरूपात निषेध मोर्चा काढून पनवेल तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, सरकारी कार्यालये, अंत्ययात्रा आदींना विविध निर्बंध आखून परवानगी दिली जाते तर मग सरकार वारी का खंडित करीत आहे.? आम्ही देखील सर्व सूचना आणि निर्बंधांचे पालन करू. परंतु सरकार परवानगी न देता वारकऱ्यांची परंपरा खंडित करीत असल्याने सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

– सुभाष कडव ( विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड संयोजक)