मुरुडला वणवे लागण्याची शृंखला सुरू : वणवे लागतात कि लावले जातात ?

0
238

कोर्लई : मार्च महिना सुरु होताच वणवे लावण्याच्या प्रमाणात आता प्रचंड वाढ झाली असून अक्षरशः मुरुडचा राजवाडा ते दत्त मंदिर व एकदरा डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी होरपळताना दिसत आहेत. त्यामुळे प्रचंड वनसंपदेची हानी होत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली असून आगीच्या भीतीने पशु-पक्षांचा मोर्चा गावाकडे वळला असल्याचे चित्र दिसून येत असून याकडे वनखात्याचे दुर्लक्ष व डोळेझाक होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वनखात्याने राजवाडा परिसरात जाळरेषा अभियान राबविण्यात आले होते. तरीही हे मोठे मोठे वणवे लागल्याने या अभियानाचे तिनतेरा वाजलेले पाहावयास मिळत आहे.
दररोज डोंगरांना लावण्यात येत असलेल्या वणव्यामुळे मुरुड तालुक्यातील उसरोली सुपेगाव डोंगरावर, राजवाडा परिसर ते दत्त मंदिर, एकदरा या ठिकाणचे डोंगर वणव्यात होरपळताना दिसत आहेत. तर सततच्या लागत असलेल्या वणव्यामुळे डोंगरात वनसंपदेची प्रचंड हानी होत असून यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच पशु पक्षी होरपळत असून नागरिकांचा जिव तुटत आहे. तर हाकेच्या अंतरावर असलेल्या मुरुड येथील वनखात्याला मात्र याच काहीच वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत असल्याने वनखाते डोळेझाक करत नाही ना ? असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.
सरकारकडून पर्यावरणावर कोट्यवधी रुपये खर्च करून जंगलात तसेच विविध ठिकाणी सामाजिक वनीकरण खाते कोट्यवधींच्या संख्येने झाडे लागवड करण्याचा अभियान राबतात. परंतु, यातील किती झाडे जगली आणि किती मेली, अद्याप याचा हिशेब लागला नाही. गेली कित्येक वर्षांपासून शिकार करणे व इतर कामासाठी डोंगरांना वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून यामुळे संपूर्ण वनसंपदेची प्रचंड हानी होते आहे.
हवामानात होणारे बदल (ग्लोबल वॉर्मिग)मुळे निसर्गही दिवसेंदिवस आपले रूप बदलत असताना दिसत असून कधी चक्रीवादळ तर अवेळी येणारा पाऊस कोणत्याही महिन्यात कधीही पडू लागल्याने हवेतील उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढते आहे. हे असेच सुरु राहिले तर मानवी जीवनही धोक्यात येईल.अशी भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे वनखात्यासह व संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगलातील वणवे रोखण्यासाठी ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी वन्य प्रेमी, प्राणी मित्र, पक्षी मित्र व पर्यावरण प्रेमींमधून केली जात आहे.