सुवर्णमहोत्सवी वर्षाची “एक गाव एक गणपती ” परंपरा जपणारं आदर्शवत रिटघर गाव

0
71

नवीन पनवेल : मराठी परंपरेत गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा,संस्कृती आणि एकात्मतेचा खोल मूर्त स्वरूप आहे ह्या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचे घरगुती पूजेचे भव्य सार्वजनिक कार्यक्रमा रूपांतर केले आणि म्हणून गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे.आणि ह्याच धार्मिक उत्सवाला सामाजिक स्वरूप देण्याचं आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते पनवेल तालुक्यातील रिटघर ह्या आदर्श गावात एक गाव एक गणपती “ही परंपरा जोपासत पहिल्यांदा १९७५ मध्ये गावातील जाणकार मंडळींच्या माध्यमातून एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप देत त्याच वर्षी गावातील मंदिरात गणपती बाप्पांना विराजमान करत गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात करण्यात आली. यंदाच उत्सवी वर्ष हे सुवर्ण महीत्सवी (५० वे) वर्ष म्हणून साजरा होतं आहे.
गणपती उत्सवाचं महत्त्व लक्षात घेता आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश उत्सवाचे स्वरूप पाहता एक गाव एक गणपती या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गावं एकत्रित यावा, गावात एकोपा नांदावा म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण गावातील अबालवृद्ध, महिला भगिनी, युवावर्ग ,ग्रामस्थ मंडळी एकत्र येत आपले सर्व मतभेद बाजूला सारून अगदी गुण्यागोविंदाने ह्या उत्सवात सहभागी होत असतात. खास करून ह्या गावाने जपलेला हा एकात्मतेचा वारसा खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आदर्शवत असाच आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमाअंतर्गत आरती, पारायण, प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागर ,काकडा, ज्ञानेश्वरी पारायण अश्या पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
रिटघर गावात साजऱ्या होणाऱ्या ह्या भक्तिमय उत्सवाला सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळीं सोबतच शासकीय क्षेत्रातील,पोलीस विभागातील उच्चपदस्थ अधिकारी वर्ग दर वर्षी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवित असतात अशी माहिती रिटघर गावचे सरपंच सुभाषशेठ भोपी यांनी दिली. ग्रामीण भागांत विशेषतः घरोघरी गणपती बसविण्याची प्रथा आहे मात्र रिटघर गावाने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक गाव एक गणपती ही परंपरा आज पर्यंत अविरतपणें सुरू ठेवत सुवर्ण मोहत्सवी वर्ष साजरं करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे ज्याचं आज सर्व स्तरांतून कौतुक केलं जातं आहे.