Home ठळक बातम्या अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता यंत्रणांनी अधिक अलर्ट रहावे – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दरडप्रवण अन पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नदयाची पातळी इशारास्तरापर्यंत आहे. या नद्यांजवळच्या गावातील प्रशासनाने घेतलेली खबरदारी, पर्यायी व्यवस्था, यंत्रणेची सुसज्जता याची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. तहसीलदारांना आवश्यक त्या साधन, सुविधा सज्ज असतील याची खात्री करण्यास सांगितले आहे. आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही तत्काळ करावी. तातडीने मदत व बचाव कार्य यासंबंधी यंत्रणांनी कार्यक्षमतेने काम करावे पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभाग, बंदर विभाग आदी महत्त्वाच्या विभागांना त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
सर्व शासकीय विभागप्रमुखांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या सूचनेनुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून “अलर्ट मोड’ वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्याला देण्यात आलेल्या रेड अलर्ट च्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.