बोर्ली पंचतन परिसरातील मोबाईल कंपन्यांची सेवा वा-यावर

0
15

कापोली :  विजय कांबळे
मोबाईलच्या सवयींमुळे मनुष्य प्राण्याला जडलेल्या रोगाने ऑनलाईनच्या दुनियेत मोबाईलवरून कोणतीच कामे वेळेवर होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पार वैतागले आहेत.आणि त्यातच श्रीवर्धन तालूक्यातील बोर्लीपंचतन, कापोली,दिवेआगर, शिस्ते, वडवली, वेळास,भरडखोल या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क देणाऱ्या एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या सेवेचा मागील काही महिन्या पासून फज्जा उडाला असून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सेवेकडे कोणतेही अधिकारी चांगल्या व अखंडित सेवेसाठी तत्पर दिसत नसल्याने दूरध्वनी व मोबाईल नेटवर्किंग सेवेबाबत परीसरात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
कायम गजबजणारी श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती असणारी बोर्लीपंचतनही परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन सोबतच परिसरातील पर्यटन स्थळ असलेले दिवेआगर तसेच वेळास, कापोली, शिस्ते, कोंढेपंचतन, वांजळे, भरडखोल, वडवली, तसेच इतरही छोटी मोठी गावे आहेत. इंटरनेटच्या युगात सर्व कार्यालये, महाविद्यालये ऑन लाईन पद्धतीने जोडली गेली आहेत. परंतु सध्या एअरटेल, व्होडा फोन, आयडीया मोबाईल कंपनीच्या सेवेला घरघर लागली असून नेटवर्क असुनही नसण्याचे प्रकार वाढले आहेत.
मागील वर्ष भरा पासून मोबाईल नेटवर्क कासव गतीने चालत असुन होणाऱ्या सेवेकडे संबधित कंपन्यांमधील अधिकारी सोयिस्कररित्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, अशा स्वरूपातील असलेली मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेट सेवा गेल्या वर्षापासून साफ कोलडमली असल्याचे दिसत असून,सामान्य जनतेला याचा प्रचंड त्रास होत आहे. बाजारपेठेत ऑनलाइन व्यवसाय करणा-या सर्वांना सध्या या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय संपूर्ण परीसरात कासव गतीने नेटवर्क चालत असल्याने ग्राहकांकडून प्रत्येक महिन्यात मारावा लागणारे रिचार्ज पैसे वाया जात आहेत ह्याला जबाबदार कोण असा सवाल ग्राहकांकडून उपस्थितीत केला जात असून कंपन्यांविरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे.जीओ नेटवर्कचे देखिल वेगळे असे काही नाही.
मध्येच नेट तर जातोच पण फोन काॅलही ड्राॅप होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. फोनवर बोलता बोलता अनेकदा फोन कट होत असल्यामुळे धड फोनवरही बोलणं होत नाही. महागाईच्या काळात आधीच लोकं कंगाल आहेत. त्यातूनही नाईलाजाने ग्राहक महिन्याचे पूर्ण पैसे भरूनही संबंधित कंपन्यांना ग्राहकांना अखंड सेवा पुरवण्यासाठी वेळ नाही .संबंधित अधिका-यांकडे संपर्क केला असता काही दिवसाने सेवा अधिक चांगली व जलद होईल अशी असमाधानकारक उत्तर देत चालढकल करून वेळ मारून नेतात.
तर वारंवार तक्रार देऊनही मोबाइल कंपन्या लक्ष नसल्यासारख्या अविर्भावात आहेत. वारंवार तलाठी ऑफीस, ग्रामपंचायत यांच्याकडेही सामान्य जनतेने तक्रार मांडली आहेच, हिच तक्रार जागृत नागरिकांकडून टेलिकॉम कंपन्यांना सुध्दा दिली आहे. परंतू तक्रार निवारण काहीच होताना दिसत नाही.
कोलमडलेल्या अवस्थेत मोबाइल कंपन्या उभ्या आहेत, यासर्वांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर बोर्लीपंचतन परिसराची अवस्था कणा मोडल्यासारखी राहील. ग्राहक सर्वच दुरध्वनी व मोबाईल सेवेला त्रासली असून कंपनी सुरळीत व उत्तम दर्जाची सेवा केव्हा देणार ? ह्या सा-या प्रकारात ग्राहकांची घुसमट होत आहे.

” मोबाईल रिचार्ज करुन वाया जातो. कारण ना धड बोलता येत ना नेट वापरु शकत. एखादी मह्त्वाची गोष्ट डाऊनलोड करायची असेल तर तासंतास वाट पहात बसावे लागते. आता तर काय बोलता बोलता फोन कट होतात. याकडे संबंधित कंपन्यांनी लक्ष द्यावे नाहीतर नेटवर्क तरी बंद करून टाकावेत कुणीही अवलंबून राहणार नाही ”
ग्राहक प्रदिप हेदुकर(शिस्ते)

“एअरटेल, आयडिया,व्होडा फोन नेट वर्क सेवा पुर्ण कोलमडली आहे.परीसरात नेटवर्कचा खूप बोजवारा आहे.या नेटवर्क वाल्यांना एवढं कळत नाही की, आजकाल सर्व ठिकाणी नेटची गरज आहे मग ते शैक्षणिक असो किंवा व्यावसायिक असो.नेटमुळे डिस्ट्रिब्युटर लोकांनाही मालाची विक्री किंवा खरेदी करता येत नाही.”
धवल तवसाळकर( सामाजिक कार्यकर्ते) वेळास