भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन
नवी मुंबई (विमाका) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीए) येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण (पीएसए) मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 चे हैद्राबाद हाऊस नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेएन पोर्ट पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2, उरण जि. रायगड येथे उपस्थित होते. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्राला समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त करत, या प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या ‘अमृत काल दृष्टिकोन’ला समर्पित केले.
या उद्घाटन समारंभाला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, पराग शहा, चीफ कमिश्नर कस्टम विनल श्रीवास्तव आणि जेएनपीएचे प्रमुख उन्मेश वाघ यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जेएनपीए आणि पीएसए इंडियाच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. वाढवण बंदराच्या कार्यान्वयनामुळे जेएनपीए लवकरच जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. यामुळे महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल. या प्रसंगी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारनाम्यांवर (MoUs) स्वाक्षऱ्या झाल्या, ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल. या टर्मिनलमुळे महाराष्ट्राने भारतातील बंदर क्षमतेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून, जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवले जाणारे हे टर्मिनल 100% अक्षय ऊर्जेवर कार्यरत असून, समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरूप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे. या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता 4.8 दशलक्ष टीईयू इतकी झाली असून, घाटाची लांबी 2000 मीटरपर्यंत वाढली आहे. यात 24 घाट क्रेन आणि 72 रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) यांचा समावेश आहे.
या फेज-2 विस्तारामुळे बीएमसीटीची क्षमता 2.4 दशलक्ष टीईयूपासून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू झाली आहे. हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे 63 हून अधिक इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी)शी जोडले गेले असून, हे भारतातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क आहे. जून 2025 पासून हे टर्मिनल ‘सुविधांसाठी तयार’ होते आणि आजच्या उद्घाटनामुळे राज्यातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला नवीन आयाम मिळणार आहे.
उद्योग तज्ञांनी या विस्ताराला ‘गेम-चेंजर’ म्हटले आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि बहुआयामी पायाभूत सुविधांसह, पीएसए मुंबई भारताच्या सागरी विकासाचा प्रमुख चालक बनण्यास सज्ज आहे. या उद्घाटनासह भारत जागतिक समुद्री अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यास पुढे सरसावत आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली, तर जेएनपीएचे प्रमुख उन्मेश वाघ यांनी टर्मिनलच्या विस्ताराबाबत प्रास्ताविक केले.