मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
6

मुंबई : जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘ जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात व्यक्त केला.
कार्यक्रमास व्यासपीठावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी शब्दकोश तयार केला. त्यावेळी प्रशासन चालविताना मराठीवर फारशी, अरबी या भाषांचे आक्रमण होते. त्यामुळे मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. मराठी भाषेचा अभिमान हा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होतो. सुरुवातीच्या काळातील आद्य ग्रंथांमधून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते.
महाराष्ट्राच्या विधान मंडळात चालत असलेले कामकाज राजकीय क्षेत्र साहित्य निर्मिती करणारे आहे. या कामकाजामधूनच अनेक चित्रपट, नाट्य यांच्या कथानकांना विषय मिळत असतात. मराठीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रय मिळवून दिला आहे. मराठी भाषा, आपल्या भाषेतील साहित्य आणि लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.