उरण तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा

0
13

उरण : उरण तालुक्यातील शेकडो बांधकाम कामगार, महिला, शेतकरी,युवक संघटीत होऊन चारफाटा ते उरण तहसिलदार कार्यालयावर मोदी सरकार चलेजाव घोषणा देत दाखल झाले.हा मोर्चा,सीआयटीयू, किसान सभा, जनवादी महिला संघटना व डी.वाय.एफ.आय.यांच्या संयुक्त विद्यमाने काल 10 ऑगस्ट रोजी 11:00 वाजता आयोजित करण्यात होता.आज देशभरात संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाची हाक दिली आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रमसंहिता रद्द करा, पूर्वीचे कामगारांना संरक्षण देणारे कायदे लागू करा, कामगार कर्मचारी यांना ३० हजार रुपये दरमहा वेतन द्या, बांधकाम कामगारांच्या बंद केलेल्या २० योजना पुर्ववत सुरु करा, विस्तारीत गावठाणासह गावांची मोजणी करुन प्रत्येक घराला सनद( प्रॉपर्टी कार्ड) द्या, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, बांधबंदिस्तींची दुरुस्ती करुन शेतीचे गावांचे संरक्षण करा, मच्छीमारांचे डिझेल परतावे वेळेवर द्या, पुढील पाच वर्षांत कोणत्याही शिक्षण व्यवस्थेतील फी वाढ करु नका, पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत द्या.
प्रकल्पग्रस्तांना , स्थानिकांना प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यातील नोकर भरती मध्ये प्राधान्य द्या,स्त्रियांना विधानसभा, लोकसभेत ३३टक्के आरक्षण द्या, महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा, रेशनिंग व्यवस्थेतील काळा बाजार बंद करा, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करा, महागाई कमी करा,विरार अलिबाग कॉरीडोअर बाधित शेतकऱ्यांना ५० लाख रुपये प्रती गुंठा भाव द्या,एमएमआरडीए प्रकल्प रद्द करा, स्मार्ट वीज मिटर लावू नका, आरोग्य सुविधेत सुधारणा करा, खड्डे मुक्त रस्त्यांची निर्मिती करा. अशा देशव्यापी , राज्यव्यापी, स्थानिक मागण्यांसाठी हा मोर्चा उरण तहसिलदार कार्यालयावर काढण्यात आला होता.